सुधीर गाडगीळ! काही माणसांविषयी ना एक अनाम कुतुहल असतं, त्यातलाच हा एक ...8000 पेक्षा जास्त मुलाखती घेणारा हा माणूस कसा असेल? काय असेल त्याच अनुभवविश्व? हे जाणुन घ्यायची इच्छा सगळयांचीच असते, नाही का? त्यामुळेच परिक्षेच्या काळात एखादं हलक फुलक पुस्तकं घ्यावं म्हणून ''अक्षरा''त गेलेलो असताना प्रभावळकरांच्या ''टिपरे'' ला मागं टाकून गाडगीळांच्या ''ताजतवानं'' न नकळत बाजी मारली.
दिवस परिक्षांचे होते, त्यामुळे वेळ मिळेल तसे पुस्तक वाचू लागलो. अवघ्या दोन पानांचा एक लेख. पेपरात लिहिताना छोटं लिहावं लागतं हे माहिती होतं. पण, ते छोट इतक छान लिहिता येत हे इथ दिसत होतं. पण, त्याहून महत्वाची गोष्ट म्हणजे ते फक्त लिहायच म्हणुन लिहित नव्हते तर त्यातून काही विचार देत होते, टिप्पणी करत होते. माणसांना ''ताजतवानं'' करणं हा त्यांचा स्थायीभाव आहे हे लोक 30 वर्ष जाणतात. ते त्यांनी करणं यात फारस नाविन्य नाही. पण, त्यातुन काही सांगण हे जास्त महत्वाचं आणि तेही सगळ्याना लगेच समजेल असं! गंमत म्हणजे यातल्याच काही मुद्यावर 4-4 पाने मी खरडल्याचे मला आठवते. पण, तेच त्यांनी 4 ओळीत त्याच ताकदीने मांडले. मग या निवेदकाच्या लेखणीला दाद द्यावयालाच हवी, नाही का?